दशक १६ समास सात महद्भूत निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. वायु एकटाच नाना देह धारण करतो. एकटाच परोपरीने नटतो, त्याच्याशिवाय दुसरी नाट्यकला, किंवा नट कलाकार दुसरा कोणी नाही. तो एकटाच बहुरूपी आहे. तो बहुसाक्षेपी आहे. बहुरूपाद्वारे बहू प्रताप करणारा आणि फसविणारा आहे. तो एकटाच कसा विस्तारला? दांपत्य नसताना कसा विस्तारला हा बहुविध तमाशा कसा पाहतो? हे एक आश्चर्य आहे. स्त्रीला पुरुष हवा आणि पुरुषाला स्त्री हवी असा दोघांना आवडीचा संतोष असतो. स्थूळाचे मूळ लिंग असतं. सूक्ष्मदेहांतील वासनेमुळे भेद निर्माण होतो. त्याच्यावर सगळं जग चालतं.
पुरुषाचा जीव स्त्रियांच्या जीवामध्ये जातो अशा प्रकारची उठाठेव होते पण या सूक्ष्मदेहातील वासनेचा गुंता उलगडला पाहिजे. स्थूल गोष्टीमुळे भेद वाटतो सूक्ष्मामध्ये सगळेच भेद नसलेले. अशा प्रकारचं बोलणं निश्चितपणे प्रत्ययाला आलं. बायकोने बायकोला भोगले असं कधी घडत नाही. बायकोच्या अंतरी पुरुषाचं ध्यान लागलं. स्त्रीला पुरुष पुरुषाला वधू अशा प्रकारचा हा संबंध आहे. यामुळे सूक्ष्म संवाद आहे तो सूक्ष्माद्वारेच व्यक्त होतो.
पुरुषाच्या ठिकाणी जी इच्छा ती म्हणजे प्रकृती. प्रकृतीमध्ये जी मी पणाची जाणीव असते ती म्हणजे पुरुष. म्हणूनच त्याला प्रकृती पुरुष म्हणतात. पिंडावरून ब्रम्हांड पहावं. प्रचितीने प्रचिती घ्यावी. उमजले नाही तरी विचार करून समजून घ्यावे. मूळ मायेतच सगळ्यांच्या उगमामध्येच द्वैत आहे. त्यामुळे ते भूमंडळात आले आहे. भूमंडळ आणि मूळ आहे ते नीट पाहावे. श्रोत्यांचा मोठा आक्षेप होता तो येथे दूर झाला. प्रकृती आणि पुरुष यांचे जे वेगळेपण आहे ते स्पष्ट झालं असं समर्थ म्हणतात. इतिश्री दासबोधे गुरु शिष्यसंवादे महद्भूत निरुपण नाम समास सप्तम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक सोळा समास आठ आत्माराम निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. ज्याच्यामुळे मती स्फूर्ती पावन होते लोक आत्म्याचं स्तवन करतात अशा मंगलमूर्ती गणपतीला नमन करूया. त्यानंतर वागेश्वरी सरस्वतीला नमन करूया. ती आत-बाहेर प्रकाश निर्माण करते. तिच्या उपस्थितीमुळे नानाविद्यांचं आकलन होतं. सगळ्या जनांमध्ये रामनाम हे उत्तमात उत्तम असं आहे. ते घेतले असता श्रम नाहीसे होऊन विश्राम मिळतो. चंद्रमौळी म्हणजे शंकर देखील हे नाम घेऊन सुखी झाला असा नामाचा महिमा थोर आहे. त्याचं रूप हे उत्तरोत्तर श्रेष्ठ आहे. राम हा परात्पर परमेश्वर त्रैलोक्य धारण करणारा आहे. आपण आत्माराम ज्याला म्हणतो तो चहूकडे आहे. लोकांना जिथे वावडे आहे तिकडे सुद्धा तो आहे. आत्मा नसला तर मृत्यू होतो. जिवात्मा शिवात्मा परमात्मा जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा देव दानव आणि मानवामध्ये असतो.
जन्ममृत्यूचा क्रम, व्यवहारिक मार्ग, अवतार पंक्तीची चालती बोलती गती आत्म्यामुळेच आहे. ब्रह्मादिक निर्माण होतात आणि जातात. नादरूप, ज्योती रूप, साक्षरुप, सत्तारूप, चैतन्यरूप, सस्वरूप, द्रष्टारूप आत्मा असल्याचे जाणावे. नरोत्तम, विरोत्तम, पुरुषोत्तम, रघुत्तम, सर्वोत्तम, उत्तमोत्तम, नाना खटपट आणि चटपट, नाना लटपट आणि झटपट आत्म नसला तर सगळीकडे सगळे सपाट. आत्मा नसेल तर वेडे कुडे, शरीरात आत्मा नसेल तर शरीर म्हणजे केवळ थंडगार शव! आत्मज्ञानी माणसाला मन समजते. लोकामध्ये तो आत्मा पाहतो. भवन किंवा त्रिभुवन आत्म्याशिवाय ओस आहे. अत्यंत सुंदर आणि चतुर हे आत्म्याद्वारे जाणता येते, आत्मा नसेल तर सगळीकडे उभय लोकांमध्ये अंधकार आहे. सर्वांगी सिद्ध, सावध, नाना भेद नाना वेध आणि आनंद या आत्म्यामुळे आहे. रंक असो किंवा ब्रह्मादिक असो आत्माच सर्व चालवतो. हा नित्यानित्य विवेक कोणीही पहावा. ज्याच्या घरी पद्मिनी नारी असली तरी आत्मा आहे तोवर तो तिची आवड बाळगतो. आत्मा शरीरातून गेला तर तेज कसे राहील? आत्मा दिसत नाही, भासत नाही. बाह्य आकारावरून त्याचा अंदाज करता येत नाही. मनाच्या नाना कल्पना या आत्म्यामुळेच उद्भवतात. असं समर्थ सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

मोबाइल- ९४२०६९५१२७