अहमदाबाद विमान दुर्घटना – रमेश विश्वास कुमार यांचा चमत्कारिक जीव वाचला

2

नवी दिल्ली | दि. १२ जून २०२५-Ahmedabad Plane Crash गुजरात मधील अहमदाबाद शहरात गुरुवारी एक भीषण विमान अपघात झाला. एअर इंडियाचं अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान टेकऑफनंतर अवघ्या काही सेकंदांतच कोसळलं. या दुर्घटनेत २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, एकमेव जीव वाचलेला प्रवासी म्हणजे रमेश विश्वास कुमार.

‘डोळे उघडले तेव्हा सगळीकडे मृतदेह होते'(Ahmedabad Plane Crash)
रमेश यांनी सांगितले, “जेव्हा मी डोळे उघडले, तेव्हा सगळीकडे फक्त मृतदेहच होते. मी घाबरलो आणि फक्त धावू लागलो.” टेकऑफनंतर अवघ्या ३० सेकंदांत जोरदार आवाज झाला आणि विमान जमिनीवर कोसळलं. “काही समजायच्या आधीच सगळं संपलं होतं,” असं ते म्हणाले.

रमेश कुमार यांना छाती,डोळे आणि पायावर गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते ११A सीटवर प्रवास करत होते, अशी माहिती अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी.एस.मलिक यांनी दिली.

 

१० मिनिटांच्या उशीरामुळे फ्लाईट चुकली आणि भूमी यांचा जीव वाचला.

एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमान दुर्घटनेत २०४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असतानाच, एक घटना सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अहमदाबादच्या भूमी चौहान या महिलेला फक्त १० मिनिटांच्या उशीरामुळे फ्लाईट चुकली आणि त्यांचा जीव वाचला.

भूमी चौहान या पतीसोबत लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. सध्या त्या भारतात सुट्टीसाठी आल्या होत्या आणि गुरुवारी त्या लंडनला परतण्यासाठी एअर इंडियाच्या AI171 फ्लाईटने प्रवास करणार होत्या. मात्र घरातून वेळेत निघूनही अहमदाबाद शहरात प्रचंड ट्रॅफिकमुळे त्यांना विमानतळावर पोहचायला उशीर झाला.

फक्त १० मिनिटांच्या उशीरामुळे भूमी यांचं बोर्डिंग वेळेत होऊ शकलं नाही आणि त्या फ्लाईट पकडू शकल्या नाहीत. दुपारी १.३० वाजता त्या परत घरी गेल्या, आणि काही वेळातच, १.३८ वाजता उड्डाण केलेलं विमान थोड्याच अंतरावर कोसळलं.

भूमी यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. “मी पूर्णपणे हादरून गेले आहे, बोलूही शकत नाही. माझं संपूर्ण शरीर थरथरतं आहे. मी फक्त माझ्या गणपती बाप्पाचे आभार मानते. बाप्पानेच मला वाचवलं, असा माझा ठाम विश्वास आहे.”

भूमी यांचा हा चमत्कारिक बचाव अनेकांसाठी आश्चर्य आणि श्रद्धेचा विषय ठरतो आहे. मृत्यूपासून फक्त काही मिनिटांच्या अंतरावरून परत आलेल्या भूमीच्या अनुभवाने संपूर्ण देश हादरून गेला आहे.

 

या विमानात कोण होते?
या विमानात २४२ प्रवासी होते. त्यामध्ये
१६९ भारतीय,
५३ ब्रिटिश,
७ पोर्तुगीज
आणि १ कॅनडियन नागरिकांचा समावेश होता.
या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?
इंडिगोच्या पुण्याला जाणाऱ्या फ्लाइटचे प्रवासी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, “आम्ही फ्लाइटमध्ये चढत असताना एक घनदाट धुराचा लोळ दिसला. वाटलं की जणू जंगलात आग लागली आहे. पण ते विमान अपघात होता याची कल्पना नव्हती.”विमानतळावर काही वेळातच सगळं ऑपरेशन थांबवण्यात आलं आणि अनेक प्रवासी अडकले.

हे अपघात कसा झाला?
एअर इंडियाचं विमान टेकऑफनंतर काही सेकंदातच अचानक मोठ्या आवाजासह कोसळलं. अपघाताचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालं नसून, DGCA आणि इतर तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल आहेत.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!