नाशिक (प्रतिनिधी) : ‘बिकमिंग योगी’ पुस्तकात प्रवासवर्णनाचा वेगळा आवाज असून जगण्यातल्या मुशाफिरीचा सारांश यातील लेखनांत आला आहे. प्रवास हा तुमच्यातील शक्यता आणि अशक्यता अनुभूतीचा प्रवास असतो. निसर्ग पर्यावरणाची नेमकी जाणीव अधोरेखित करण्यासाठी प्रवास हा जीवनमार्ग आहे. त्यासाठी सुंदरतेचा शोध घेण्याचा प्रवास ही पर्वणी आहे.म्हणून हे पुस्तक जीवनाचा नवा शोध घ्यायला भाग पाडते, असे प्रतिपादन लेखक, अभिनेते दीपक करंजीकर यांनी केले.
‘बिकमिंग योगी’ या योगेश गुप्ता यांच्या 44 देशांची भ्रमंती, 4 वर्ष सायकल प्रवासावर आधारित अनुभव सदर पुस्तकात स्नेहा संजय पाटील यांनी शब्दांकित केले आहेत. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन फ्रावशी इंटरनॅशनल स्कूल, गंगापूर धरणाजवळ, गिरणारे रोड, नाशिक येथे संपन्न झाले, त्याप्रसंगी दीपक करंजीकर बोलत होते.
योगेश गुप्ता म्हणाले की, हा फक्त शरीराचा प्रवास नसून भावनांचा, एका जिद्दीचा प्रवास आहे. या प्रवासात निसर्ग मला मित्रासारखा लाभला. स्वतःतील अस्वस्थपणाचा शोध घेण्यासाठी ही सफर होती. मी कोण आहे याचा शोध तसेच स्वतःला बदलून टाकण्याची प्रक्रिया होती. यातून जीवन जगण्याचा नेमका मार्ग सापडला, असेही योगेश गुप्ता म्हणाले.
लोकमतच्या फिचर एडिटर अपर्णा वेलणकर यांनी योगेश गुप्ता व स्नेहा संजय पाटील यांची मुलाखत घेतली व प्रवासातील कठीण प्रसंग, करिअर, धाडस, नवं जग कसं आहे याविषयी त्यांना बोलते केले.
स्नेहा पाटील यांनी योगेश यांच्या मनातील प्रवास जाणून घ्यावा व इतरांना प्रेरणा मिळावी यातून हे पुस्तक लिहिल्याचे सांगितले. राजहंस प्रकाशनाचे, संपादक डॉ. सदानंद बोरसे यांनी मनोगतात सांगितले की, भाषेचा डौल, प्रामाणिकपणा, नितळ पारदर्शीपण हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. एकांताचा वेध घेणारा हा प्रवास आहे. स्मरण साखळी म्हणून यातील अनुभव आहेत उत्तम कथनशैली या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
फ्रावशी इंटरनॅशनलच्या शर्वरी लथ यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना म्हणाल्या की, अद्भूत आणि मनामनांत नवं घडवण्याचा संदेश देणारा हा प्रकाशन सोहळा आहे. यातून सर्वांना जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल, हेच या पुस्तकाचे यश आहे.
यावेळी फ्रावशी इंटरनॅशनलचे अध्यक्ष रतन लथ, शर्वरी लथ, आर्किटेक्ट संजय पाटील, विजया पाटील, डॉ. वृंदा भार्गवे, विनायक रानडे, पंकज क्षेमकल्याणी, विद्या करंजीकर, सुनिल भायभंग, एन.सी. देशपांडे, डॉ. सुधीर संकलेचा, नितीन मुजुमदार, विक्रम उगले आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन मोनालिसा कचोळे यांनी तर आभार अनघा पाटील यांनी मानले.