नाशिकमध्ये मोठी दुर्घटना,खासगी बसने घेतला पेट; १० जणांचा आगीत होरपळून मृत्यू
मुख्यमंत्र्यांकडून तीव्र दुःख व्यक्त : मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार
नाशिक,८ ऑक्टोबर २०२२- नाशिक – औरंगाबाद रोडवर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. हॉटेल मिरची जवळ खासगी बसचा अपघात झाल्यानंतर बसने अचानक पेट घेतला. या भीषण अपघाताने तब्बल १० जणांचा जीव घेतला तर २९ जण जखमी झाले असून जखमींमध्ये १९ पुरुष ८ महिला ,१ लहान मुलगा तसेच १ लहान मुलीचा समावेश आहे.
औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे ५ वाजून १५ वाजेच्या सुमारास भीषण अपघातात झाला. या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतला. या आगीत बसमधील जवळपास दहा प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना सदर अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.घटनास्थळी अग्निशमन दलाची तीन ते चार वाहनं तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आलं त्यांनी उड्या मारल्या तर आतमध्ये अडकलेले प्रवासी आगीमुळे जळून खाक झाले. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.सदर अपघातानंतर बस ५० ते ६० फूट पुढे घसरत गेली तर टँकर ७० ते ८० मीटर पुढे जाऊन थांबला. या अपघातात बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बसमधून हलविण्यात आले. या घटनेत १० लोक जळून खाक झाले तर ३४ जणांवर उपचार सुरू आहेत.
सदर अपघात घडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी नवीन आडगाव नाक्यावर असलेल्या वाहतूक पोलीस चौकीत धाव घेतली. तसंच पोलिसांना याबाबत कळवलं. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले
नियंत्रण कक्षा चे दुरध्वनी क्रमांक जाहीर
आज पहाटे नाशिक शहरामध्ये ट्रेलर व ट्रॅव्हल बस यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातामुळे जखमी व मयत व्यक्ती विषयी अधिक माहिती संबंधितांना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन शाखा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून सदर नियंत्रण कक्षा चे दुरध्वनी क्रमांक खालील प्रमाणे आहेत
+912532572038
+912532576106
नाशिक नांदूरनाका अपघातावर मुख्यमंत्र्यांकडून तीव्र दुःख व्यक्त
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार
नाशिक- नांदूरनाका येथे झालेल्या खाजगी बसच्या भीषण दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करून या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघाताच्या कारणांचा सर्वंकष चौकशीतून शोध घेतला जाईल. त्याबाबत सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. घटनास्थळावरील मदतीसाठी तसेच रूग्णालयातील उपचारासाठी सर्व यंत्रणा तातडीने कार्यान्वित व्हाव्यात यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिककडे रवाना
आज पहाटे नाशिक -औरंगाबाद रोडवर झालेल्या भीषण अपघाताची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानाने नाशिककडे रवाना झाले असून ११ वाजेच्या सुमारास ते ओझर विमानतळावर पोहचणार असून ११:३० च्या सुमारास ते घटनास्थळी दाखल होणार आहेत.त्यानंतर जखमींची विचारपूस करण्यासाठी ते शासकीय रुग्णालयाला भेटदेणार आहेत .
अपघातातील जखमींवर उपचार सुरु आहेत त्यांची यादी