Nashik : युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन 

0

नाशिक,२ फेब्रुवारी २०२३ – नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन झाले ते ३२ वर्षांचे होते.पंचवटी डेपोसमोरील उड्डाण पुलावर बुधवारी रात्री १२.१५ च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मानस पगार हे सहकाऱ्यासमवेत पिंपळगावकडे परतत होते. मागून आलेल्या वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या मानस पगार यांचे निधन झाले.त्यांच्या वाहनात असलेले अन्य दोघे गंभीर जखमी झाले. मानस पगार हे युवक काँग्रेसमधील चर्चेतला चेहरा म्हणून ओळखले जायचे. तसेच सत्यजीत तांबे यांचे निकटवर्तीय मानले जात होते.

या अपघातात त्यांचे सहकारी सूरज मोरे हा गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मानस पगार यांच्या अकाली मृत्यूचे वृत्त समजताच राज्य व देशपातळीवरील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोशल मिडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. अनेकांना या वृत्ताने धक्का बसला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतही मानस हे हिरीरीने सहभागी झाले होते.

ते सोशल मीडियावर काँग्रेसची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडत असत. त्यामुळे पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेर मानस पगार यांनी दीर्घकाळ केलेल्या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती. दानवेंनी शेतकऱ्यांसाठी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेमुळे त्यांच्या घरासमोर उपोषण करण्यात आले होते. त्यात मानस पगार आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या सुटकेसाठी युवक काँग्रेसने सोशल मीडियावर मोहीम सुरू केली होती.

पगार यांच्या निधनानंतर युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्वीट करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. “माझा खंबीर पाठीराखा, सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे”, असं तांबे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मानस पगार यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!