मुंबई,दि. २८ सप्टेंबर २०२३ –नैऋत्य मोसमी पाऊस माघार परतण्यास सुरुवात झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. राजस्थानमधून नैऋत्य मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून काही भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. आज अनंत चतुर्दशी बाप्पाच्या विसर्जनाला मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
देशात आजपासून पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेशसह अनेक राज्यात आज २८ सप्टेंबरपासून ३० सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज १० दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होणार असून राज्यासह देशात ठिकठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह देशभरात अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळणार आहे.महाराष्ट्रासह गोवा, राजस्थान, तामिळनाडू आणि गुजरातच्या काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यासोबत आंध्रप्रदेश, कर्नाटक, झारंखड, बिहार या राज्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे. छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशात जोरदार पाऊसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज आहे.अहमदनगर, औरंगाबाद, सातारा, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. बीड, परभणी, सोलापूर, जालना आणि हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.तर २९ सप्टेंबरपासून पूर्व भारतात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.