नवी दिल्ली ,दि, ३० एप्रिल २०२५ – दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी सरकार तर्फे मोठी घोषणा करण्यात आली केंद्र सरकारने आता देशभरात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. त्याचप्रमाणे या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय रेल्वे तथा देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली.
देशभरात जातनिहाय जनगणना केली जावी, अशी गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून मागणी केली जात होती. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अनेकदा हा मुद्दा लावून धरला होता. देशाच्या विकासात कुणाचं किती योगदान आहे ते जाणून घेण्यासाठी कुणाची संख्या किती आहे ते समोर यावं, अशी भूमिका राहुल गांधी यांनी याआधी अनेकदा मांडली आहे. त्यामुळे त्यांची मागणी आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण झाल्याचं बघायला मिळत आहे.
कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर कमिटीची देखील आज बैठक झाली. या बैठकीत स्वत: अश्विनी वैष्णव यांनी त्याबाबत माहिती देताना सांगितलं की, दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी संसदेत भाषण देताना म्हटलं होतं की, जनगनणा केली जाईल. पण नंतर सोशो इकोनॉमिक सर्वेक्षण केलं गेलं. त्यामध्ये जातीचा विचार केला गेला होता. पण त्याचे आकडे जाहीर झाले नव्हते. काही राज्य सरकारने सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला होता. पण राज्य सरकारने केलेल्या सर्व्हेत पारदर्शकता नव्हती, असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.
जातीय जनगणना केली पाहिजे, अशी सातत्याने मागणी केली जात होती. त्यामुळे आज कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आणि या बैठकीत जातीय जनगणना होईल, असा निर्णय घेण्यात आला. २०२५-२६ च्या सुरुवातीला देशभरात जातीय जनगणना केली जाईल, असा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.