पुण्यात भीषण दुर्घटना :इंद्रायणी नदीवर जुना पूल कोसळला,२ मृत; ३० पर्यटक वाहून गेले

1

पुणे, दि. १५ जून २०२५ –Pune Kundmala Bridge Collapse पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे आज दुपारी भीषण दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळून मोठी जीवितहानी झाली असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २५ ते ३० पर्यटक नदीत वाहून गेले असण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.

ही घटना तळेगाव दाभाडे जवळील पर्यटनस्थळी घडली असून, रविवार असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होती. अनेक पर्यटक पूलावर सेल्फी आणि फोटो काढत असताना एकाचवेळी ओव्हरलोड झाल्यामुळे पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

फॅब्रिकेटेड ब्रिज कोसळल्याचे कारण (Pune Kundmala Bridge Collapse)
स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा पूल फॅब्रिकेटेड होता. काहीजण त्यावरून दुचाकी घेऊन जात होते. त्यामुळे पूल ओव्हरलोड झाला आणि मधला भाग कोसळला. आतापर्यंत २ जण मृत झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.”

एनडीआरएफ, पोलीस, स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल असून शर्तीचे शोध व बचावकार्य सुरू आहे.

लहान मुलेही अपघातात अडकले?
दुर्घटनेच्या वेळी काही लहान मुले आणि महिलाही पुलावर असल्याची माहिती आहे. त्यामुळे घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. नदीला जोरदार प्रवाह असल्याने अनेकजण दूरवर वाहून गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पूल धोकादायक असतानाही खुला कसा? – सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले, “जर पूल धोकादायक होता, तर तो आधीच बंद करणे आवश्यक होते. प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू करावे आणि जखमींना तातडीची मदत मिळावी.”

पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या कुंडमळा परिसरात हादरले वातावरण
प्रत्येक पावसाळ्यात पर्यटकांचा ओघ असलेल्या कुंडमळा या ठिकाणी आजचे दृश्य हृदयद्रावक होते. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला जोरदार पूर आला असून, पाण्याची पातळी खूप वाढलेली आहे.

घटनास्थळी प्रशासनाचे आवाहन
पोलिसांनी आणि प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, “घटनास्थळी गर्दी करू नये. बचावकार्य सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.” प्रशासनाने मृतांचे आणि बेपत्ता पर्यटकांचे नावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतून बचावलेला गणेश पवार या तरुणाचा अनुभव धडकी भरवणारा आहे. स्वतः बाईकवरून पूल ओलांडत असताना पूल कोसळला आणि गणेश पाण्यात कोसळला. मात्र, आश्चर्यकारकपणे त्याने पाण्यातून स्वतःचा जीव वाचवून इतर ४ ते ५ लोकांचे प्राण देखील वाचवले.

गणेश पवार म्हणाला, “मी पुलावर बाईकवर होतो. मीही पाण्यात पडलो, पण वर निघालो. पाण्यात अडकलेल्यांपैकी ४-५ लोकांना बाहेर काढलं. वर आल्यावर पुन्हा पलिकडे जाऊन बाईक घेतली आणि इंदुरीवरून परत आलो.” त्याने २०० ते २५० लोक त्या वेळी पुलावर होते, असा खळबळजनक दावा केला. त्याच्या अंदाजानुसार, ७५% लोक वाचले, तर २५% अजून अडकले होते.

फडणवीस यांचा तातडीने हस्तक्षेप, बचावकार्य वेगात
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत सांगितले की, “घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.”
ते पुढे म्हणाले, “मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व तहसीलदार यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे. घटनास्थळी एनडीआरएफ पाठवण्यात आली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.”

फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार :
६ जणांना वाचवण्यात यश
३२ लोक जखमी, त्यापैकी ६ गंभीर
रुग्णालयात तातडीने उपचार सुरू
सर्व आपत्कालीन यंत्रणा अलर्ट मोडवर

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
Don`t copy text!