राज्यात मुसळधार पावसाचा कहर:मुंबई-ठाण्याला रेड अलर्ट

कोकणात पूरस्थिती, अनेक गावांचा संपर्क तुटला

0

मुंबई, १६ जून २०२५ –Monsoon Rain Alert Maharashtra महाराष्ट्रात मान्सूनने पूर्ण ताकदीनिशी एंट्री घेतली असून, कोकण, मुंबई आणि विदर्भासह घाटमाथ्याच्या भागांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात पावसाचा जोर इतका वाढला आहे की अनेक गावांचा संपर्क तुटला असून पूरस्थिती निर्माण झाली आहे.

🌧️ मुंबईसह चार जिल्ह्यांना रेड अलर्ट(Monsoon Rain Alert Maharashtra)
मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील ३ तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला गेला आहे. मुंबईत अंधेरी सबवे पाण्याखाली गेला असून, अनेक रेल्वे मार्गांवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा उशिराने सुरू आहे.
पवई, विक्रोळी, घाटकोपर, भांडुप, मुलुंड या भागांत जोरदार पावसामुळे सखल भाग जलमय झाले आहेत.

🌊 रत्नागिरीत पूर: मंदिर पाण्याखाली, घाटात दरडी कोसळण्याची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री नदीला पूर आला असून, संगमेश्वर तालुक्यातील सोमेश्वर मंदिर पूर्णतः पाण्याखाली गेले आहे. परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती वाहून गेल्याने धोका वाढला आहे.
राजापूर शहरात पूर स्थिती असून जवाहर चौकापर्यंत पाणी साचले आहे.

🌊 सिंधुदुर्गात समुद्राला उधाण, २० गावांचा संपर्क तुटला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनाऱ्यावर ३ ते ३.५ मीटर उंचीच्या लाटा उसळत असून, समुद्राला उधाण आले आहे. कणकवली आचरा मार्ग पाण्याखाली गेल्याने १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे.
होडावडे पूल जलमय झाला असून वाहतूक पर्यायी मार्गे सुरू आहे.

🚨 कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर
पंचगंगा, भोगावती आणि कुंभी नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
राजाराम बंधारा जलमय,राधानगरी धरणातून प्रति सेकंद 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग,
कुंभी धरणातून प्रति सेकंद 300 क्युसेक विसर्ग सुरू आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

🌧️ सातारा आणि पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा
सातारा व पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता प्रवाशांना घाटमाथ्यावर प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

🌧️ विदर्भातही पावसाचा जोर
अमरावती, गोंदिया, भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्येही काही भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली असून, पुढील काही तास अशाच पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

📌 थोडक्यात अपडेट
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर – रेड अलर्ट
रत्नागिरी, सिंधुदुर्ग – पूरस्थिती, संपर्क तुटलेली गावे
कोल्हापूर – नदीकाठच्या गावांना इशारा
घाटमाथा – दरडी कोसळण्याचा धोका
विदर्भ – पावसाचा जोर वाढतोय

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!