लावणी पोरकी झाली ! ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन

0

मुंबई,१० डिसेंबर २०२२ – साठ दशकाहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी  ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले.त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

आज संध्याकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर मरिन लाइन्स येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. वृद्धापकाळामुळे त्यांच्या स्मृतीतही काही राहत नव्हते. यावर काही उपाय नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरीच ठेवण्याचा निर्णय दिला होता. त्यांच्या पश्चात धाकटा मुलगा, सून, मोठ्या मुलाची पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.

सुलोचना चव्हाण यांनी सोळावं वरीस धोक्याचं, उसाला लागलं कोल्हा, आंबा आलाय पाडला, पावणा ;पुण्याचा आलाय गं.. अशा शेकडो लावण्या त्यांनी अजरामर केल्या.  काही महिन्यांपूर्वीच त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.सुलोचना चव्हाण यांनी त्यांच्या आवाजाने रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी म्हणून त्यांची ओळख होती. एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्या सुलोचना यांनी गायल्या आहेत.त्यांनी कस काय पाटील बर हाय का? पाडाला पिकलाय आंबा, मला म्हणत्यात पुण्याची मैना, तुझ्या उसाला लागला कोल्हा, अशा अनेक लोकप्रिय गाण्यांना त्यांचा बुलंद आवाज दिला होता. ही गाणी खूप लोकप्रिय ठरली. आजही या गाण्यावर लोक थिरकल्या शिवाय राहत नाही.वयाच्या पाचव्या वर्षीपासून त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. मराठी व्यतिरिक्त त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये देखील त्यांच्या आवाजाची जादू दाखवली आहे.

सुलोचना चव्हाण या त्यांच्या कलेसाठी जेवढ्या प्रसिद्ध होत्या तेवढ्याच त्या मनाच्या मोठेपणासाठी आणि दिलेला शब्द पाळण्यासाठीही प्रसिद्ध होत्या. आपण समाजाचं देणं लागतो यावर त्यांचा दृढ विश्वास होता आणि म्हणूनच सुलोचना यांनी ६० वर्ष विदर्भ, खानदेश, मराठवाडा येथे शाळा, महाविद्यालय, देऊळ, अनाथाश्रम यांच्या मदतीसाठी कार्यक्रम केले. त्यांनी स्वतःच्या आजारपणाचीही पर्वा केली नव्हती. एवढंच नाही तर त्या स्वतःच्या लहान मुलांना इतर कुणाकडे ठेवूनही दहा-दहा दिवस इतरांना मदत मिळावी म्हणून दौऱ्यावर जायच्या. त्यांच्या निधनाने लावणी पोरकी झाली अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!