ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे यांना पहिला कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान प्रदान
जीवनाचा सारांश म्हणजे कविता - अरूण म्हात्रे
पुणे – अनेक तत्ववत्ते, विचारवंत, साहित्यिक, आयुष्याचा अर्थ लावण्यात गढलेले असतात. पण तोच अर्थ कवीला एका कवितेच्या चार ओळींमधून देखील गवसतो, कारण आयुष्यापेक्षा कविता मोठी असते आणि त्यात जीवनाचा सारांश दडलेला असतो, असे मत ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे यांनी व्यक्त केले.
कवी कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनानिमित्त विदिशा विचार मंच, पुणे तर्फे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा कवितेचा वारसा एक वसा म्हणून पुढे नेणारे ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे यांना गेल्या पाच दशकातील मराठी काव्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पहिला कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान आज प्रसिद्ध लेखक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत म्हात्रे बोलत होते.
पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्रसिद्ध लेखक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी उपस्थित होत्या. रूपये पाच हजार आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी ‘कवितेच्या वाटेवर…’ हा धागा पकडून अरूण म्हात्रे यांनी मुलाखतीमधील विविध प्रश्नांना उत्तरे देताना मराठी काव्य क्षेत्राविषयी भाष्य केले. यावेळी श्रोत्यांमध्ये साहित्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे म्हणाले की, तुम्ही आयुष्यात कोणत्याही भूमिकेत असलात तरी त्या भूमिकेला प्रतिभेची जोड लाभत नाही, तोपर्यंत ते जीवन अर्थहीन असते. आज साहित्य क्षेत्रात चढा-ओढीचे वातावरण असताना मी इतरांच्या कविता कशा सादर करतो, या प्रश्नाला मला नेहमीच सामोरे जावे लागते. एखादी सुंदर कविता माझ्या नजरेत किंवा ऐकण्यात आल्यावर ती कविता थोरामोठ्या पासून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी माझी धडपड सुरू असते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात साहित्य प्रतिभा लाभलेले, जीवनाचे गाणे गाणारे अनेक कवी दडलेले आहेत. त्या जीवन गाण्यापासून कोणी वंचित राहू नये म्हणून मी त्यांचे जीवनगाणे इतरांपर्यंत पोहोचविण्याचे काम करतो. मला आजवर अनेक दिग्गज कवींच्या नावाचे आणि मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्या सर्व पुरस्कारांविषयी आदर बाळगत आजच्या पुरस्काराचे मोल अनेक पटींनी जास्त आहे, असे म्हणावेसे वाटते. कुसुमाग्रज अर्थात तात्यासाहेबांच्या परिस्पर्शाने कवितेचे अंकुर उगवत आहेत आणि कवितेचे अंगार धुमसत आहेत. मनात ओलावा असला की, सादरीकरणही आपोआप उत्तम होते. मला अनेक ज्येष्ठ कवींचा सहवास लाभला, त्याअर्थाने मी खूप भाग्यशाली आहे.
यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, कुसुमाग्रज हे साहित्य विश्वातील अढळ तारा असून अवकाशातील एका ताऱ्याला देखील आपण त्यांचे नाव दिले आहे. ते एक लखलखते नक्षत्र आहे. त्यांचे काव्य केशवसुतांच्या कवितेच्या पुढे दोन पावले जाणारे होते. तात्यासाहेबांनी समाजाला काव्यसन्मुख केले. त्यांनी त्यांच्या कवितेतून कठोर प्रहार केले, पण त्यांनी कोणाला जखमी केले नाही. अरुण म्हात्रेंची कविता याच धाटणीची असून कुसुमाग्रजांचा वारसा पुढे नेत आहेत, ही फार कौतुकास्पद बाब आहे. ते साहित्यनिष्ठा आणि जीवननिष्ठेचे पाईक होते. कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्रभाव आजही समाजमनावर टिकून आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी यांनी केले, तर सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले. विदिशा विचार मंचचे समन्वयक नितीन जळूकर यांनी आभार मानले.