भावार्थ दासबोध -भाग -१०५

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक सातवे समास दहावा देहान्त निरूपण

जय जय रघुवीर समर्थ. मरणासाठी उत्तरायण उत्तम असते दक्षिणायन चांगले नसते असा भ्रम संशयी माणसांना असतो. साधू मात्र निसंदेह असतो. शुक्लपक्ष उत्तरायण  दिवस असताना मरण आले,अंती देवाचे स्मरण असले तर चांगली गती मिळते असे म्हणतात. मात्र  हे योग्यांना लागू नाही. तो जिवंत असतानाच मुक्त झालेला असतो.  पाप-पुण्याची त्याने तिलांजली दिलेली असते,

देहाचा अंत झाला, देह सुखरूप गेला तो धन्य झाला असे अज्ञानी लोक म्हणतात.हे जनांचे मत विपरीत आहे.शेवटी भगवंत भेटतो असं कल्पना करून स्वतः लोक आपला घात करतात. जिवंतपणी सार्थक केलं नाही व्यर्थ आयुष्य निघून गेलं. पेरलं नाही तर ते उगवेल कसं? ईश्वराचं भजन होता येईल ज्याप्रमाणे केले तरच पावन होता येईल. मुद्दल असेल तर त्याच्यावर व्याज मिळते, त्याप्रमाणे दिल्याशिवाय मिळणार नाही. पेरल्याशिवाय उगवणार नाही हे वाक्य लोकांना माहितीच आहे.सेवेचा व्यापार न करता मालकाला म्हणतो कुठे माझे पैसे? माझा पगार? कशा प्रकारे अभक्त नराला स्वहित घडत नाही. जिवंतपणी भगवत भक्ती केली नाही तर मेल्यावर मुक्ती कशी मिळेल?

लोक जे जे करतात तसं तसं त्यांना फळ मिळतं. भगवतभजन न करता शेवटी पावन होत नाही. बरे मरण आले तरी भक्तीशिवाय अधोगतीच आहे म्हणून साधूने आपले जीवन असतानाच सार्थक केले पाहिजे. ज्याचं शरीर त्याप्रमाणे कारणी लागलं ते धन्य होत. जे जीवनमुक्त ज्ञानी आहेत त्यांचे शरीर रानामध्ये पडले किंवा स्मशानात पडले तरी धन्य झाले. साधूचा देह खितपत पडला किंवा कुत्र्यांनी भक्षिला हे लोकांना योग्य वाटत नाही, पण ही त्यांची मंदबुद्धी म्हणावी लागेल. असा अंत चांगला नाही ही अशी असं म्हणून लोक कष्टी होतात पण हे अज्ञान आहे. त्यांना नेमके काय ते समजत नाही. जो मुळात जन्मला नाही, त्याला मृत्यू कसा येईल? ज्याने विवेकबळाने स्वस्वरूपाचे संधान साधून जन्म-मृत्यूचा घोट घेतला आहे, त्याला मृत्यू नाही.

स्वरूपाचे संधान साधून सगळी मायाच नाहीशी केली, त्याचा पार ब्राह्मादिकला देखील कळत नाही. तो जिवंत असतानाच मेला त्याने मरणाला मारून टाकले. त्याला जन्म-मृत्यू आठवत नाही असा तो आहे. तो लोकांमध्ये दिसतो पण वेगळा असतो, त्याचे वर्तन करताना निराळा वाटतो, त्याला दृश्य पदार्थ स्पर्शत नाहीत. कोणतीही ममत्वाची भावना त्यांच्यामध्ये नसते. अशा प्रकारचे साधुजन त्यांचे भजन केलं असता त्या भजनाने इतर लोक पावन होतात. सद्गुरुचा जो साधक अंकित झाला आहे, त्याने विवेक करावा. विवेक केल्यावर तर्क निरुपणातून बाहेर येईल. अशा प्रकारचं प्रांजळ निरूपण केल्यामुळे तुमचे समाधान होईल हे साधकांना प्रांजल सांगण आहे. जो संतांना शरण गेला तो संत होऊन बसला. इतर जणांना उपयोगी आल हा त्याचा कृपाळूपणा होय. असा संतांचा महिमा आहे. संतसंगामुळे ज्ञान होते.

सत्संगासारखे साधन दुसरे कोणतेही नाही. गुरु भजनाच्या आधाराने निरुपणाच्या विचाराने शुद्ध क्रियेच्या निर्धाराने उच्च पद मिळवावे. सद्गुरुचे भजन हेच परमार्थाचे जन्मस्थान. सद्गुरुभजनामुळे समाधान मिळते. देह मिथ्या हे जाणून त्याचं सार्थक करावं. भजन करून सद्गुरूंचे चित्त तोषवावे. ज्या प्रमाणे नाना प्रयत्न करून माता बालकाला वाढवते, त्याप्रमाणे शरणागत आलेल्याची जो चिंता करतो तो खरा सद्गुरू. सद्गुरुचे भजन ज्याला घडते तो धन्य. सद्गुरु शिवाय वेगळे समाधान नाही. इथेच शब्दांची खटपट संपली. ग्रंथाचा शेवट जवळ आला, तिथे सद्गुरूचे भजन करा असे स्पष्ट सांगितले आहे. सद्गुरुच्या भजनासारखे मोक्षदायक दुसरं काही नाही, ज्याला हे पटत नाही त्याने गुरुगीता अभ्यासावी असा सल्ला समर्थ देत आहेत. पुढील कथा ऐकूया पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!