वेगळे आणि अत्यावश्यक : नात्यांचे सर्व्हिसिंग

"ग्रंथ पेटीतून"

0

तुम्ही कसे वागता, किती चांगलं काम करता यावरूनच स्वत:बद्दलचा आदर आणि आत्मसन्मान वाढतो! या आत्मशोधक विचारांनी लेखक विश्वास जयदेव ठाकूर यांनी आपल्या बँकींग क्षेत्रातील कडू-गोड अनुभवांची शिदोरी, नात्यांचे सर्व्हिसिंग या पुस्तकातून वाचकांसमोर ठेवली आहे.आपल्या आजूबाजूला हरेक प्रकारची माणसं वावरत असतात. त्या बहुरंगी समाजातूनच आपण वेगवेगळे जीवनानुभव घेत असतो. या कडू-गोड अनुभवांच्या मालिका संपता संपत नाही. किंबहुना हेच आपलं जीवन असतं. परंतु कधी अडथळ्यांची मालिका वाढत गेली की आपला कस लागतो. मनाला आपसुक नैराश्य येतं. या संकटांतून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी आपल्यावर झालेले संस्कार, जपलेली मूल्यं, आपली सद्सदविवेकबुद्धी असा एकत्रित विचार जमून आला की प्रश्‍न मार्गी लागतात.

परंतु, या दरम्यान मनावर पडलेले व्रण किंवा ओरखडे हे पुसता पुसत नाहीत. त्यांच्या गोष्टी-कथा होतात. त्या आपल्याला दृष्टी देऊन जातात. कळत-नकळत समृद्ध करतात. शहाणं वगैरे करून सोडतात. अशा आपल्या दैनंदिन जीवनातल्या अनुभवांना लेखक समरसून भिडतांना दिसतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात गुंतून जातो आणि विचार करतो की, ङ्कअरेच्या असं का झालं असावंङ्ख! ङ्कअसं व्हायला नको होतं!ङ्ख असं प्रत्येक कथा वाचल्यावर मनात आल्याशिवाय राहात नाही.

कर्जाऊ पैसे आणि हक्काचे (?) पैसे मिळवतांना गरजवंतांची गोची आणि मानसिकता लेखकाने यात अचुक पकडलेली आहे. पैसा झाला मोठा आणि माणूस झाला छोटा! अशा अनुभवांच्या या कथा वाचकाला सजग करतात. त्यात आदेश किंवा स्वत:ची बढाई येत नाही. फक्त असे कुणाबाबत होऊ नये. अपयशाकडेही संधी म्हणून पाहता येईल! असा वस्तुपाठ देणारं हे परिणामकारक पुस्तक आहे.लेखक ठाकूर हे एक उत्तम वक्ते आहे. तेच ओघवते, प्रसन्न कसब येथे लेखकाने पुरेपुर उतरवलंय. या गोष्टी आपण प्रत्यक्ष ऐकतोय असा सुंदर अनुभव येतो. स्वत:चा शोध घेणार्‍या या कथा माणूसकीच्या नात्यालाच साद घालतांना दिसतात. माणूस, माणसापासून तुटू नये. असलेलं मैत्रं अबाधित रहावं! म्हणून लेखकाचा अट्टहास त्यांच्यातील माणूसकीचा प्रत्यय देतो.

नात्यांचे सर्व्हिसिंगमधील घटना फार भव्यदिव्य नाहीत. परंतु, म्हणून या अगदी सहज घ्याव्यात अशाही नाहीत. या नावे बदलून लिहिलेल्या सत्य घटना आहेत, म्हणून या गोष्टीतील नात्यांची गुंतावळ वाचकाला अस्वस्थ करतात. त्यातील महत्त्व कथेला उंची देतांना दिसतात.या पुस्तकात लेखक – विश्वास जयदेव ठाकूर यांच्या चौफेर व्यक्तिमत्वाची रूपं वाचायला मिळतात. केंद्रस्थानी नसली तरी, त्यांची भव्यता किंवा मोठेपण हे या कथांचे सौंदर्य आहे. तरीमात्र ‘आयुष्यभर पुरणारी सल’ या कथेत, आपल्या स्वत:च्या वडीलांविषयी लेखकाने घेतलेली कर्तव्यकठोरता, शिस्त ही वाचकाच्या पचनी पडायला जड जावी, अशी झाली आहे.

आईच्या पैशांचा हिशेब, मोठे तेवढे खोटे, स्वप्न पाहणारी पिढी, मोह मोहके धागे अशा सर्वच कथा मनाला संपूर्ण अस्वस्थ करतात. या एकूण 25 कथांना ‘या कृतघ्नतेचे काय करायचे?’ अशा व्याखेत बसवता येईल. या अनुभवांबरोबरच काही सकारात्मक अनुभवांच्याही कथा पुस्तकात आल्या असत्या तर पुस्तक परिपूर्ण झाले असते, असे वाटते.

हे पुस्तक वाचल्यावर, वाचक स्वत:च्याही आयुष्यात हमखास डोकावणार! असे होणारच. या कथांना बँकिंग क्षेत्राची पार्श्‍वभूमी असली तरी थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्याच आयुष्यात ‘नात्यांची सर्व्हिसिंग’ न झालेले अनुभव असतातच असतात. त्यांचा ताळा घेण्याचा मोह व्हावा. अशा नात्यांना क्षमा करून आनंदी जगण्याची एक दृष्टी या कथा देतात.या विचारशील पुस्तकात पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची आश्वासक प्रस्तावना आणि कविश्रेष्ठ वसंत आबाजी डहाके यांची उबदार पाठराखण लाभले आहे. एक सर्वार्थानं देखणं पुस्तक शब्दमल्हार प्रकाशनाने मराठी साहित्याला दिलेलं आहे. साहित्याच्या प्रांतात लेखक विश्वास जयदेव ठाकूर यांचे सहर्ष स्वागत.

– विवेक चि. उगलमुगले

Natyaanche Servicing

नात्यांचे सर्व्हिसिंग
लेखक: विश्वास जयदेव ठाकूर
प्रकाशक: शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक
पृष्ठे : 155 । किंमत : रु. 99/-
(आपल्या पुस्तकाविषयी जनस्थान ऑनलाईनच्या “ग्रंथ पेटीतून”या सदरात माहिती द्यायची असल्यास आपण janasthanonline@gmail.com या ई-मेल आयडी वर संपर्क करू शकतात.)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!