मुंबई – देशाच्या स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत देशभरात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली आहे .राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. बस मधून मोफत प्रवास देण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्यात ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आता एस.टी.चा प्रवास मोफत करता येणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. हा लाभ नक्की कधीपासून मिळेल हे मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले नाही. मात्र, यासंदर्भात राज्य सरकारकडून लवकरच आदेश काढले जाणार आहेत.त्यानंतर एसटी महामंडळाकडून त्याची अंमलबजावणी सुरू केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सहकार मंत्री अतुल सावे, सार्व. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.