नाशिक,१४ एप्रिल २०२३ – स्वावलंबन भारत अभियान, नाशिक, सहकार भारती व राणी भवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पापड महोत्सवाचे उद्घाटन दि. १४ रोजी सिडको येथील लक्षीका मंगल कार्यालय येथे नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडावर, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ श्री विनायक गोविलकर , उद्योजिका विना माजगावकर, स्वावलंबी भारत अभियान वरिष्ठ प्रकल्प अधिकारी अरविंद दोरवट, सहकार भारती राष्ट्रीय महिला समन्वयक रेवती शेंदुर्णीकर, रेडीओ विश्वास संचालिका रुचिता ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
पापड महोत्सव प्रास्ताविक स्वावलंबी भारत अभियान महिला समन्वयक मंगल सोनवणे यांनी केले. यात त्यांनी पापड महोत्सव प्रेरणा व महिलांना व्यावसायिक वृद्धी साठी बाजारपेठ उपलब्धीची गरज यामुळे हा पापड महोत्सव भरवत असल्याचे सांगितले. प्रदर्शनाला शुभेच्छा देतांना उद्योजिका विना माजगावकर यांनी यापुढे महिलांना गृह उद्योजिका न बोलता सर्वांनी त्यांना महिला उद्योजक बोलून त्यांचा सन्मान करायला हवा व यापुढे नवभारत निर्मितीमध्ये महिलांचा मोठा सहभाग असणार आहे असे सांगितले.
स्वावलंबी भारत अभियान वरिष्ठ प्रकल्प अधिकारी श्री अरविंद दोरवट यांनी महिलांना व्यवसायात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर उपाय उपलब्ध असुन त्यांना सर्वोतोपरी मदत स्वावलंबी भारत अभियान मार्फत केली जाईल असे सांगितले. अर्थतज्ज्ञ श्री विनायक गोविलकर यांनी महिलांनी लोकसंखेतील ५० टक्के वाट्या बरोबरच उद्योगातील ५० टक्के वाटा उचलावा तेव्हाच देश प्रगतीपथावर वाटचाल करेल असे आवाहन केले. महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडावर यांनी महिलांनी खाद्य संस्कृती जोपासत असतांना समाजाला त्याचे उपयोग देखील सांगण्याचे आवाहन केले तसेच महिला बचत गटांना विक्री व्यावसायिक संधी मनपा तर्फे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगितले.
या महोत्सवात वेगवेगळ्या प्रकारचे पापड, बटाटा पापड, वेगवेगळ्या कुरडई, डाळींचे वडे, शेवई, वेफर्स, उपवासाच्या पापड्या, साबुदाणा चकली, याच बरोबर वेगवेगळे पापडाचे पीठ, नाचणी पीठ , नाचणी भाकरी, चिक वडी याची सुध्दा मेजवानी नागरिकांना उपलब्ध केली असुन सर्वांनी १५ एप्रिल संध्या ०८ पर्यंत या महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन स्वावलंबन अभियान नाशिकचे नाशिक व नगर प्रकल्प अधिकारी योगेश शिंदे,संपर्क अधिकारी वैभव गुंजाळ व आयोजन समिती मार्फत केले आहे .