भावार्थ दासबोध – भाग ३३

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

समाजामधली पत नाहीशी झाली. घरातल्या वस्तू गहाण पडल्या. आता दिवाळखोरीची वेळ आली. काहीतरी उपद्व्याप केले, घरातल्या वस्तू विकल्या थोडेफार पैसे कसेतरी मिळवले. थोडे कर्ज घेतले, काहीतरी दांभिकपणा केला, लोक म्हणू लागले वडिलांचे नाव राखले. कर्ज वाढले मग सगळे कर्ज देणारे जे होते ते सावकार आले. मग काय विदेशात पळून जायला लागले. दोन वर्ष दुसरीकडे जाऊन कमी दर्जाची कामं, सेवा केली. भरपूर शारीरिक त्रास भोगला. थोडेफार धन मिळवलं आणि मग पुन्हा त्याला घरची आठवण झाली मग पुन्हा मालकाची परवानगी घेऊन घराकडे परत आला. तेव्हा त्याला अत्यंत नाराज झालेली त्याची बायको वाट पाहत असलेली दिसली. इतके दिवस कुठे गेले होते. काय झालं होत. आता आम्ही काय खायचे? काय करायचं? की उपाशी मरायचे? देवा यांची संगत आम्हाला का दिली? असे घरचे म्हणू लागले.

ते आपले सुख पाहत होते मात्र त्याची चिंता कोणास नव्हती. शक्ती गेल्यावर कोणीही कामास येत नाही. अचानक कारभारी आलेला पाहून मुले आनंदली, त्याच्याकडे पाहून धावली. बाबा आमच्यासाठी काय आणले? स्त्री देखील आनंदली, म्हणाली आमचे दैन्य दूर झाले. त्याच्या हातातील गाठोडे यांनी घेतले. सगळ्यांना आनंद झाला. म्हटले, आमचे वडील आले. त्याने आम्हाला कपडे, टोप्या आणल्या असतील. असा आनंद चार दिवस चालला. नंतर कुरबुर सुरु झाली. म्हणाले, हे पैसे गेले तर पुन्हा आमच्यावर संकट येईल. त्यांनी आणलेले ठेवावे आणि आता पुन्हा परदेशात जावं आणि आम्ही हे खाऊन संपवू तोपर्यंत आमच्यासाठी द्रव्य मिळवून आणावं. सगळे सुखाचे सोबती असतात. स्त्रीला अत्यंत प्रीति असते मात्र तिला देखील सुखच हवे असते. विदेशात गेल्यावर त्याला खूप दगदग झाली होती, विश्रांती घ्यायला आलेला होता पण श्वास सोडला नाही तोच पुन्हा विदेशात जाण्याची पाळी आली.

काहीतरी निमित्त सांगून राहण्यासाठी त्याने ज्योतिषाचे निमित्त पुढे केले. मुहूर्तच शोधला,काही धन फराळाचे साहित्य एकत्र घेतलं, मुलांकडे पाहिले, आणि पुन्हा परदेशात जाण्यासाठी निघाला. बायकोला पाहिलं आपण बायकोला सोडून जायचे याचं खूप दुःख वाटलं. इच्छेविरुद्ध जायला लागतय असे त्याच्या मनामध्ये आले. कंठ सद्गदित झाला. सावरे ना.गहिवरला तो मनुष्य. ताटातूट झाली. ऋणानुबंध असेल तर पुन्हा भेट होईल आपली नाही तर मग हीच आपली शेवटची भेट. नाही येणार असे म्हणून तो परदेशात जाण्यासाठी निघाला. तो पुन्हा मागे फिरून फिरून पाहू लागला. वियोगाच दुःख त्याला सहन होत नव्हत. पण काही उपाय नाही. आपला गाव मागे राहिला. संसारामुळे चित्त भ्रमिष्ट झाले. त्याप्रसंगी आईची आठवण झाली. धन्य धन्य ती माऊली! माझ्यासाठी तिला खूप कष्ट झाले पण मला ते समजले नाही मीच मूर्ख !

आज ती असती तर मला कधीही त्रास दिला नसता. त्याच्या मनामध्ये दुःख झालं. मन आक्रंदन करू लागले. मातेचा कळवळा वेगळाच होता. आपल्या मुलगा हा वैभवहीन, भिकारी असला तरी माता त्याचा स्वीकार करते. त्याला दगदग झाली, त्रास झाले तर तिच्या जीवाला दुःख होतं. प्रपंचाचा विचार दुसर्या कोणाही पेक्षा मातेला आपल्या मुलांची काळजी जास्त वाटते. सगळे काही मिळाले तरी मातेचे प्रेम कुठे मिळणार नाही. स्वभावाने कर्कश असलेली आई देखील आपल्या मुलावर माया करते तितक्या हजार बायका देखील करू शकणार नाहीत. पण माणूस मायेला भुलून वाया जातो. एका कामसुखासाठी तो जिवलगाबरोबरही भांडण करतो. त्याला आपली बायकोच सर्वकाही वाटायला लागते. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!