मग घरात मुलांशी सतत भांडण सुरु झाले. कोणी कोणाचे ऐकेना. पत्नी आवडती असल्याने तिचे लाड सुरु होते. मनात संशय निर्माण झाला. कोणाची खात्री वाटेना. म्हणून पाच जणांना एकत्र केले. पाच मुलांना पाच वाटे केले तरी ते ऐकत नव्हते. निकाल लागतच नव्हता. भांडण सुरु झाले. मुलांनी बापाला मारले तेव्हा बायको आरडाओरडा करू लागली. ते ऐकून लोक गंमत पाहू लागले. म्हणाले, मुले चांगली बापाच्या कामी आली. ज्यांच्यासाठी त्याने नवस सायास केले तीच मुळे बापाला कशी मारतात पहा! असा पापकलह पाहून नगरातील लोक आश्चर्य व्यक्त करू लागले. पाच जणांना पुढे बसवून समान वाटे केले आणि बापलेकांचे भांडण कसेबसे मिटवले. बापाला वेगळे काढले, त्याला झोपडी बांधून दिली. मग त्याचे मन पुन्हा बायकोची मर्जी सांभाळण्याकडे लागले. पत्नी तरुण, पुरुष वृद्ध, तरी दोघांनी दुःख न करता आनंद मानला.
वृद्धपणी मला सुंदर आणि चतुर बायको मिळाली, माझे भाग्य थोर आहे.असा आनंद तो मानत होता. तेवढ्यात पुन्हा परिस्थिती बिघडली. परचक्र आले. अकस्मात धाड पडली. बायकोला पकडून घेऊन गेले. त्यामुळे भयंकर संकट कोसळले. त्या दुःखाने मोठ्याने तो रडू लागला. माझी बायको किती सुंदर होती म्हणून आठवून दुःख झाले. त्याच वेळी बातमी आली, तुमची बायको भ्रष्ट्वली ते ऐकताच शोकाने तो जमिनीवर गडबडा लोळू लागला. डावीकडून, उजवीकडून लोळू लागला. दुःखामुळे त्याचे डोळे पाझरू लागले. दुःखरूपी अग्नीमुळे मन पोळले. द्रव्य खूप मिळालं होतं ते लग्नामध्ये खर्च केलं, दुराचारी माणसांनी बायकोलाही पळवून नेलं. मलाही म्हातारपण आलं. मुलांना वेगळं केल. आता माझ्यासमोर हे माझं नशीब उभे राहिले. द्रव्य नाही, कांता नाही, ठाव नाही,
शक्ति नाही, देवा मला आता तुझ्याशिवाय कोणीच नाही. पूर्वी देवाची पूजा कधी केली नाही, वैभव पाहून भुलला, शेखी मिरवली आणि आता वृद्धपणी तो प्राणी पस्तावला. देह खूप बारीक झाला खंगला, वात पित्त उसळलं, घशामध्ये कफ दाटला. जिभेची बोबडी वळली. घशामध्ये कफ जमा झाला, तोंडातून दुर्गंधी यायला लागली, नाकातून शेंबूड वाहू लागला. मान चळचळा कापायला लागली.
डोळे भळभळा वाहू लागले. वृद्धपणाची अवकळा आली. दात पडून गेले. त्याच्यामुळे बोचरा झाला. तोंडातून दुर्गंधीयुक्त लाळ गळायला लागली. डोळ्याने पाहिले तर काही दिसेना. कानातून काही शब्द ऐकू येईना. दम्यामुळे दम लागून काही बोलता येईना. पायामध्ये शक्ती नाही, बसता येईना, मुरकुंडी पडायला लागली. तोंडाप्रमाणे गुदद्वार वाजायला लागलं. भूक लागली ती आवरेना, वेळच्यावेळी अन्न मिळेना. मिळालं तरी दात नसल्याने चावता येईना! पित्तामुळे अन्नाचे पचन होईना. जेवण केले की ओकारी येऊ लागली किंवा तसंच संडास वाटे पडू लागलं. विष्ठा, मुत्र, नाकातोंडातील घाण, ओकारी यामुळे पुरता नाश झाला, समोरील लोकांचा श्वास कोंडला जाऊ लागला. नाना दुःख, नाना व्याधी वृद्धपणी बुद्धी देखील चळायला लागली. तरी आयुष्याची मर्यादा काही संपेना. त्याला मृत्यू येईना. पापण्या आणि भुवयांचे केस पिकून झडून गेले. सर्व अंगावर चिरकुटासारखे मांस लोंबू लागले. अशी देहाची अवस्था झाली. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७