हा दिगंबर समाधीस्थ योगी आहे असे मृत्यु म्हणत नाही.हा हठयोगी आहे असे मृत्यू म्हणत नाही.हा राजयोगी आहे असे मृत्यू म्हणत नाही, हा वीतरागी आहे असे मृत्यू म्हणत नाही.हा ब्रह्मचारी आहे, हा जटाधारी आहे, हा निराहारी आहे योगेश्वर आहे असे मृत्यू म्हणत नाही. हा संत आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा महंत आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा गुप्त होणारा आहे असा मृत्यु म्हणत नाही. हा स्वतंत्र आहे असे मृत्यू म्हणत नाही, हा परतंत्र आहे असे मृत्यू म्हणत नाही,
सर्व जीवांना मृत्यूच प्राशन करतो. काही मृत्यूच्या मार्गावर गेले, काही मृत्यूच्या अर्धा वाटेवर आहेत, काही वृद्धपणी शेवटास गेले. मृत्यू बाल म्हणत नाही, तारुण्य म्हणत नाही, मृत्यू सुलक्षण म्हणत नाही, मृत्यू छान बोलणारा विचक्षण म्हणत नाही. मृत्यू हा आधार असे म्हणत नाही, मृत्यू हा उदार असं म्हणत नाही, मृत्यू हा चतुरंग जाणणारा सुंदर असं म्हणत नाही. हा पुण्य पुरुष आहे असं मृत्यू म्हणत नाही, हा हरिदास आहे असं मृत्यु म्हणत नाही, हा विशेष सत्कृत्य केलेला नर आहे असं मृत्यू म्हणत नाही. अशाप्रकारे मृत्यूपासून कोणीही सुटत नाही. मागे-पुढे केव्हा तरी विश्वासाने मृत्यूच्या मार्गावर जावेच लागते. चारी खाणी चारी वाणी चौऱ्यांशी लक्ष जीवयोनी जितके जन्माला आले तितके प्राणी मृत्यू पावतातच. मृत्यूंच्या भीतीने पळून जाऊ पाहिले तरी मृत्यू सोडत नाही. मृत्यूला काहीही केल्या चुकविता येत नाही. हा स्वदेशी असे मृत्यू म्हणत नाही, हा विदेशी असे मृत्यू म्हणत नाही, हा निरंतर उपवाशी असं मृत्यू म्हणत नाही. हा थोर थोर असे मृत्यू म्हणत नाही, हा हरिहर असे मृत्यू म्हणत नाही, हा भगवंताचा अवतार असे मृत्यू म्हणत नाही. श्रोत्यांनी रागावू नये पण हा मृत्यूचा लोक आहे हे सगळ्यांना माहिती आहे.
जन्मलेला प्राणी मरणारच आहे याबाबत मनामध्ये शंका नाही. हा मृत्यूलोक म्हणून विख्यात आहे. सगळेजण लहानथोर जाणतात मात्र संशय घेतला तरी तो मृत्यु लोक आहे तो तसा नाही असे होणार आहे का? त्यामुळे उपजलेल्या प्राण्याचा मृत्यू होणार हे निश्चित. हे सगळं जाणून जीवनाचं सार्थक करावं. मरण पावला तरी कीर्ती रूपाने जिवंत राहावे. लहान थोर कोणीही असला तरी मरण पावतो, त्याला दुसरा उपाय नाही. भरपूर वैभव असलेले, भरपूर आयुष्य असलेले, भरपूर महिमा असलेले मृत्यूपंथाला गेले. भरपूर पराक्रमी, भरपूर कपट कर्म करणारे, भरपूर लढाई लढणारे मृत्यू पंथाला गेले.
भरपूर बळ असलेले, भरपूर काळ असलेले, चांगले कूळ असलेले कुळवंत राजे अखेर मृत्युपंथाला गेले. अनेक लोकांचे पालक, अनेकांच्या बुद्धीचे चालक, तर्कवादी युक्ती करणारे तार्किक, विद्येचे सागर, बळाचे डोंगर, धनाचे कुबेर मृत्युपंथाला गेले. भरपूर पुरुषार्थ करणारे, विक्रम करणारे, भरपूर कार्य करणारे कार्यकर्ते गेले. भरपूर शस्त्र धारण करणारे, परोपकारी असणारे, धर्माचे रक्षक असलेले गेले. नीतिमान नीतीवंत राजे, लोकप्रिय कार्य करणारे, भरपूर विवाद करणारे गेले, थाटमाट मांडणारे पंडित, शब्दांची खटपट करणारे वैयाकरणी, कवी, अचाट वाद्य वाजवणारे वादक गेले.
तपस्वी, संन्यासी, विचारवंत गेले.अनेक संसारी,अनेक वेश धारण करणारे,नाना परीचे छंद करणारे गेले.ब्राह्मण समुदाय गेले,आचार्य गेले,आता किती सांगू?अशाप्रकारे सगळे गेले! फक्त स्वरूपाकार झालेले आत्मज्ञानीच शिल्लक राहिले! इतिश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे मृत्यू निरूपणनाम समास नववा समाप्त (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७