अंतराला मिळणार मल्हारची साथ !

जीव माझा गुंतला दररोज रात्री ८.३० वा.कलर्स मराठीवर !

0

मुंबई – कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेने सुरू होताच संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले. परस्परविरोधी असे मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. नात्यांचा गुंता अधिकच वाढला. आता एकीकडे पराकोटीचा द्वेष आणि दुसरीकडे लग्नासारखे पवित्र बंधन यामध्ये दोघांचीही म्हणजेच अंतरा आणि मल्हारची कसोटी लागतं आहे.

अंतराने अनेक कठीण प्रसंगांना मोठ्या धिराने तोंड दिले. चित्राकाकी आणि श्वेताच्या जाळ्यात अडकणार की काय असे वाटत असतानाच अंतराने स्वत:ची सुटका करून घेतली. कधी सुहासिनी मदतीला आली तर कधी आजी. या दोघींची साथ खानविलकर कुटुंबात अंतराला कायमच मिळाली. सत्याच्या सोबत देवदेखील असतो असे म्हणतात ना तसेच काहीसे अंतराबरोबर घडत राहिले.

आता मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे ज्यामध्ये चित्राकाकीने अंतराला अडकवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. कारण  मालिकेमध्ये मोठी घटना घडली. चित्राकाकी आणि काकाला घरामधुन बाहेर काढले आणि यासगळ्यामागे अंतराचाच हात आहे असा चित्राकाकीचा समज झाला. आता अंतरालादेखील घराबाहेर कसे काढता येईल ? तिच्यासोबत सगळ्या खानविलकरांना जेलमध्ये कसे सडवायचे आणि सगळ्याचा ताबा कसा मिळवायचा याचा कट चित्राकाकी आणि काका रचताना दिसणार आहेत.

चित्राकाकी अंतराला ड्रग्सच्या केसमध्ये अडकवण्याचा प्लॅन करताना दिसणार आहे. दुसरीकडे, मल्हारला काका आणि काकीच्या प्लॅनबद्दल कोणीतरी  माहिती देताना दिसणार आहेत. आता या सगळ्यामधून अंतरा कशी वाचणार ? मल्हारची साथ अंतराला मिळणार का ? अंतरावर मल्हार विश्वास ठेवणार का ? हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.आता मल्हार अंतराला यातून सुखरूप सोडवू शकेल ? की चित्राकाकीने रचलेल्या या सापळ्यात अंतरा अडकेल हे बघणे रंजक ठरणार आहे.

कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली, सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, संस्कारी, आणि मेहनती अश्या अंतरावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. अंतरावर तिच्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे कष्ट आणि संघर्ष तिच्या पाचवीला पुजले आहेत. घरातील एकटी कमावती अंतरा ऑटो रिक्षा चालवून घर सांभाळते. तर, दुसरीकडे मल्हार आईचा लाडका, श्रीमंत व्यावसायिक. त्याच्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे. यशाचा ताठा असल्यामुळे तो मग्रूर आहे. व्यवहार ही प्राथमिकता असल्यामुळे उगाच भावनेत अडकणारा वा हळवा अजिबात नाही. इतक्या वेगळ्या स्वभावाचा असलेल्या मल्हारने देखील प्रेक्षकांची पसंती मिळवली.

“कोल्हापुरी बाज असलेली मालिका म्हणजे जीव माझा गुंतला होय यामध्ये भूमिका मला करायला मिळाली त्यामुळे मी खूप खुश आहे. अंतरा व मल्हारची गोड प्रेमकथा आहे. अंतरा आणि मल्हार म्हणजे दोन वेगवेगळ्या टोकांचे विचार आहेत. अंतरा तिचं कुटुंब चालवण्यासाठी रिक्षा चालवते ती भावनिक अशी आणि नात्याला विश्वास देणारी आहे. अंतरा रिक्षा सोबत बोलते तिची काळजी घेते अशी वेगळी भूमिका मला जीव माझा गुंतला या मालिकेतून करायला मिळाली आहे. कोल्हापूरच्या रिक्षावालीची भूमिका करण्याची संधी मला मिळाली तशी ही संधी चांगली आहे पण आव्हानात्मक आहे. ही भूमिका करताना मला खूप मजा आली प्रेक्षकांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

या मालिकेमध्ये अंतराची प्रेमाची व्याख्या वेगळी आहे त्याबरोबरच महिलांनी रिक्षा चालवायची पद्धत आता आपल्याकडे आली आहे त्या महिलांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळालेली आहे असे मला वाटते. कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी ही मालिका आहे. आता मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. अंतरा त्यामधून कशी स्वत:ची सुटका करून घेईल, मल्हार तिला मदत करेल का हे लवकरच कळणार आहे. असे मत योगिता चव्हाणने व्यक्त केले.”

सौरभ चौघुले यावेळेस बोलताना म्हणाला, “आयुष्यात एखादी अशी घटना घडते जी तुमचं संपूर्ण आयुष्यं बदलून टाकते. मला असं वाटतं ज्यादिवशी ज्यावेळेस मी या मालिकेला होकार दिला त्यावेळेस त्याक्षणी माझं संपूर्ण आयुष्यं बदललं. या मालिकेने मला माझी अशी ओळख मिळवून दिली आहे. प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळते आहे. आता अजून मेहनत करून प्रेक्षकांच्या अपेक्षा, माझ्या घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. अश्या प्रकारचे पात्र साकारणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. कारण मल्हार सौरभपेक्षा खूप वेगळा आहे, पण मी १०० टक्के देण्याचा प्रयत्न करतो आहे कारण मल्हारने सौरभला खूप काही दिले आहे, त्यामुळे माझं खूप काही देण लागतं या पात्राला.”

मालिकेमध्ये येणार्‍या ट्विस्टमुळे पुढे काय होणार ? मल्हार आणि अंतराचे नाते कुठलं नवं वळण घेणार ?

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.