टोकियो – तब्बल ४१ वर्षानंतर ऑलम्पिक मध्ये भारताने पदक मिळवून ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केलाय.कांस्य पदकाच्या लढतीमध्ये शेवटच्या सहा सेकंदात बलाढय़ जर्मनीला पराभूत करून अत्यंत रोमहर्षक सामन्यामध्ये ५-४ च्या फरकाने भारताने अगदी शेवटच्या सेकंदाला विजयावर शिक्कामोर्तब केला.
भारताने तब्बल ४१ वर्षानंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळात पदक जिंकलं आहे. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाचं कौतुक केलं. मोदींनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. ऐतिहासिक! आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात राहील. देशाला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील खेळाडूंचं अभिनंदन. या विजयाने प्रत्येक भारतीयाच्या मनातील स्वप्न साकार झालं आणि तरुणाईला उमेद दिली, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
शेवटचे सहा सेकंद शिल्लक असतांना जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला.भारतीय संघाचा गोलपकीपर श्रीजेशने हा प्रयत्न हाणून पाडला आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला. हा गोल झाला असता तर सामना अतिरिक्त वेळेत गेला असता आणि तिथेही गोल झाला नसता तर पेनल्टी शूट आऊटने विजेता निश्चित करण्यात आला असता. मात्र भारतीय संघाने आपला संयम कायम राखत सामना ५-४ च्या फरकाने जिंकला.
४१ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिळालेले हॉकीतले ऑलिंपिक पदक भारतीय हॉकीच्या ‘सुवर्ण’युगाच्या दिशेने नवी सुरुवात ठरेल– अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना
“भारतीय पुरुष हॉकी संघानं संघर्षपूर्ण खेळत ऑलिंपिक कांस्यपदक जिंकल्याबद्दल संघातील खेळाडू, प्रशिक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. 41 वर्षांची प्रतिक्षा, प्रयत्न, परीश्रमानंतर मिळालेल्या या यशाचा आनंद अवर्णनीय आहे. या पदकानं देशाचा गौरव वाढला असून भारतीय हॉकीच्या ‘सुवर्ण’युगाच्या दिशेनं ही नवी सुरुवात ठरेल.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष संघाचे अभिनंदन केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, भारतीय पुरुष हॉकी संघाने कधीकाळी ऑलिंपिकची आठ सुवर्णपदके जिंकली होती. 1980च्या शेवटच्या पदकानंतर पदक जिंकण्यासाठी आजपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. गेल्यावेळच्या कांस्यपदक विजेत्या जर्मनीविरुद्ध 1-3 अशा गोल पिछाडीवर असतानाही संघाने 5-4 गोलफरकाने मिळवलेला विजय हा दूर्दम्य इच्छाशक्ती, संघभावना, कठोर परीश्रमांचे फळ आहे. भारतीय खेळाडूंनी आज देशवासियांची मने जिंकली आहेत. मी सर्व खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे, व्यवस्थापक, सपोर्ट स्टाफचे अभिनंदन करतो. भविष्यातील सुवर्ण कामगिरीसाठी शुभेच्छा देतो. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय हॉकी संघाचं कौतुक केले आहे.