प्रेक्षकांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा चित्रपट “बवाल ” 

एनसी देशपांडे

0

लेखन – अश्विनी अय्यर, दिग्दर्शन – नितेश तिवारी. कलाकार – वरूण धवन, जान्हवी कपूर, मनोज पहावा, अंजुमन सक्सेना, मुकेश तिवारी आणि प्रतिक पचोरी.

प्रस्तावना
मानवी आयुष्यात ‘इमेज’ अत्यंत महत्वाची असते. माणूस हा सामाजिक प्राणी असून माणसाच्या यशापयशाचं मोजमाप त्याच्या सामाजिक प्रतिमेवर ठरतं. एकदा का ही प्रतिमा निर्माण झाली की माणूस यशाच्या पायऱ्या ओलांडायला सुरुवात करतो. परंतु अनेकदा आपली ‘इमेज’ बनवण्याच्या आणि जपण्याच्या एकुणात प्रक्रियेत खोलवर गुंतत भरकटत जातो आणि वास्तव आयुष्य जगण्यातलं सुख गमावून बसतो. कारण त्याने निर्माण केलेली ‘प्रतिमा’ बहुतांशी ‘बेगडी, खोटी आणि फसवी’ असते. मग तिच्या प्रेमात पूर्णत: बुडलेल्या व्यक्तींना ‘खरं आणि खोटं’ यातला फरकच कळत नाही आणि समाजाला झुगारून स्वत:च्या मस्तीत जगणं, हेच आपलं आयुष्य! या संपूर्ण प्रक्रियेत अपयश पचवण्याची मानसिकताच नसल्याने, अशी व्यक्ती आपल्याच दुनियेत रममाण असते. अशा मनोवृत्ती समाजात असतात परंतु आपल्याला माहित नसतात, हेच खरं! त्याची जाणीव केवळ अन केवळ त्याच्या जवळच्याच लोकांना असते आणि बाकी समाज त्याची वाहवा करण्यात मग्न असतं. अर्थात अशा व्यक्तींचा समाजावर होणारा परिणाम या बाबत कोणालाच सोयरसुतक नसतं,  ही अतिशय गंभीर बाब दुर्लक्षित रहाते, हे वाईट!
अशा व्यक्तींची किमान ओळख समाजाला व्हावी आणि त्यांच्याशी एकुणात बर्ताव कसा असावा या विचाराने प्रेरित लेखिका अश्विनी अय्यर यांनी ‘बवाल’ चं कथानक गुंफलेलं आहे. खरंतर अश्विनी अय्यर ही स्वत: एक उत्कृष्ट दिग्दर्शिका असूनही या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी याने केलं आहे.

कथासंहिता १
एकुणात ‘ज्ञान आणि ज्ञानदान’ या बाबतीत यथातथाच असलेला ‘अजय’ उर्फ अज्जूभैया रूढार्थाने एक शाळेतील शिक्षक. वर्गात मुलांना शिकवण्याच्या अजिबात भानगडीत न पडता विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेतही आपली उत्तम शिक्षकाची प्रतिमा बनवण्यात तो यशस्वी झालाय. खरंतर शिक्षकीपेशाला अशोभनीय असं हे व्यक्तिमत्व. त्याची शाळेतली एकुणात कामगिरी इतर शिक्षकांच्या लक्षात येत असते आणि मुख्याध्यापकांच्या निदर्शनासही आणून देतात. परंतु ‘अज्जुभैय्या’ च्या एकुणात प्रतिमेचे मुख्याध्यापकही बळी असतात. कारण जन्मताच लाभलेला नायकाला शोभेल असा चेहरा-मोहरा, कमावलेलं शरीर आणि आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं अशी प्रतिमा शहरात निर्माण करून हा ‘बुलेटराजा’ मिरवत असतो. शाळेतील ‘टाईमपास’ नंतर कानपूर शहरातून बुलेटस्वारी करत लोकांचे ‘दुआ-सलाम’ स्वीकारत भटकणे,  संध्याकाळी स्तुतिपाठक मित्रासोबत अपेयपान आणि रात्री उशिरा घरी, अशी एकुणात दिनचर्या किंवा शिरस्ताच म्हणाना! आपली ‘ बेगडी, खोटी आणि फसवी’ प्रतिमा जपतांना घरातील ‘आईवडील, शाळेतील मुख्याध्यापक आणि समाज’ यांच्या वागण्या-बोळण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करून मनसोक्त जगत असतो. लग्नाच्या बाजारातही स्वत:च्या प्रतिमेपलीकडे त्याला काहीही दिसत नाही. निशा(जान्हवी कपूर) त्याला सांगते की तिला एपिलेप्सीचा आजार आहे आणि अधून-मधून फिट्स(मिरगी) येत असतात, परंतु गेल्या अनेक वर्षात आलेली नाही. त्यावर तो एवढंच म्हणतो की लहानपणी मी माती खात असे, गेल्या अनेक वर्षात खाल्लेली नाही. इतक्या सहजपणे तो तिचा हा आजार स्वीकारतो. परंतु लग्नाच्या दिवशीच तिला फीट आलेली बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. अशा वेळी वास्तव स्वीकारण्यापेक्षा आपली प्रतिमा डागाळली जाईल या भीतीपोटी तिला ‘पती-पत्नी’ संबंधापासून वंचित ठेवत घरातच डांबून ठेवतो. खरंतर निशा ‘सुंदर, सुशील शिकलेली आणि हुशार’ मुलगी असते. एखाद्याला तिचा अभिमान वाटला असता. परंतु अज्जू स्वत: व्यतिरिक्त कोणावर प्रेम करण्याच्या वृत्तीचाच नसतो. इथूनच त्याची स्वत:च्या संघर्षाची सुरुवात होते. एकीकडे ‘खोटा, फसवा आणि खुदपसंद’ अजय आणि दुसरीकडे ‘अत्यंत प्रमाणिक, सालस आणि प्रेमळ’ म्हणजेच ‘वास्तव आणि अवास्तव’ अशा विरुद्ध टोकाच्या दोन व्यक्ती एकत्र बंधनात येतात आणि ‘बवाल’ सुरु होतो. अजयचे आई-वडील प्रयत्न करून थकतात परंतु अजयच्या मनोवृत्तीत काहीही फरक पडत नाही.

कथासंहिता २
इतिहासात जे केवळ वाचलं होतं, ते स्वत: बघून अनुभवून ‘आंखो देखा हाल’ आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अजयचा प्रयत्न असा पवित्रा घेत, कथानक एक वेगळंच आणि अनपेक्षित वळण घेतं. पॅरीस, बर्लिन, अॅमस्टरडॅम, नॉर्मन्डी आणि ऑश्विझ येथील अजय आणि निशाची भटकंती. दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणी, नॉर्मन्डीच्या समुद्र किनाऱ्यावर दाखल झालेल्या दोस्त राष्ट्राचं सैन्य आणि जर्मनीचं सैन्य यांच्यातील युद्ध, हजारो सैनिकांची कत्तल, मानवी संहार, प्रेतांचा खच, रक्ताचे पाट आणि वयाच्या १३ वर्षांपासून लिहिती झालेल्या अॅन फ्रॅन्कच्या वेदना, तिच्या घराला दिलेली भेट. यामुळे अजय आतून हेलावतो काहीसा विचारमग्न होतो. आता त्याचा ‘माहोल बनाना है’ या अप्रोचमध्ये हळूहळू बदल व्हायला लागतो. केवळ लोकांना मूर्ख बनवण्याच्या मूळ हेतू पासून विलग होत, तो युद्धाच्या अनुभवात गुंतत जातो. कालपर्यंत निशाचा तिरस्कार करणारा अजय आता मात्र तिच्या प्रत्येक कृतीकडे सकारात्मकतेने बघायला लागतो. लोकांना घरातून उचलतांना त्यांनी सोबत घेतलेल्या आठवणी, उराशी बाळगलेल्या तस्वीरी अशा लहान-सहान प्रसंगातून प्रेक्षकांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडलं आहे.

दिग्दर्शन
दिग्दर्शकाने ‘अज्जूभैय्या’ची भूमिका साकारण्यासाठी ‘वरुण धवन’ची केलेली निवड एकदम योग्य कारण ‘उत्तरप्रदेशीय टपोरी तरुण’ त्याने यापूर्वीही साकारला आहे. परंतु या भूमिकेमुळे ‘वरुण’च्या मर्यादा उघड्या पडतात. अनेक प्रसंगात चेहऱ्यावरील हावभाव अपेक्षित असताना तो मख्खपणे वावरला आहे. या कथानकाची मांडणी करतांना नितेश तिवारीने एक वेगळी पद्धत वापरल्याने सुरुवातीपासूनच दिग्दर्शकीय कौशल्य जाणवायला लागतं. दिग्दर्शक बरहुकूम ‘वरूण धवन’ आपल्या चेहऱ्यावरील ‘आत्मविश्वास, बेफिकिरी आणि हुशारी’मुळे अज्जू साकारण्यात यशस्वी झाला आहे. निशाचं पात्र लेखकानेच इतकं कमजोर लिहिलंय की ‘दिग्दर्शक नितेश तिवारी आणि जान्हवी कपूर’ दोघंही काहीही करू शकले नाहीत. एकुणात युद्धप्रसंग, प्रेतांचा खच, गॅसचेंबर मधील नरसंहार ‘हिटलर’ची मनमानी, छळवणूक असे संदर्भ प्रेक्षकांना मूक करतात. या प्रसंगाचं चित्रण अतिशय प्रभावी झाल्याने प्रेक्षकाना बांधून ठेवतात. खरंतर अज्जुभैय्या आणि दुसरं महायुद्ध या दोन वेगळ्या काळातील वेगवेगळ्या आणि एकमेकांशी दुरान्वये संबंध नसलेल्या गोष्टी आहेत. तरीही लेखिका अश्विनी अय्यर इतिहासाच्या संदर्भाला वर्तमानाशी जोडण्याचा प्रयत्न केला आणि नितेश तिवारीच्या प्रभावी दिग्दर्शनाने प्रारंभी गोंधळात पडलेल्या प्रेक्षकांना कथानकाशी घट्ट बांधून ठेवण्यात यश मिळवलंय. युद्धाचे प्रसंग बघतांना ‘रंग दे बसंती’ या चित्रपटाची प्रकर्षाने आठवण होते. तिथेही इतिहासाचा वर्तमानाशी जोडण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला होता.

अभिनयानूभव
वरूण धवन याचा एकुणात ‘टाईप’ लक्षात घेऊनच ही भूमिका त्याला देण्यात आली. त्यामुळे त्याला विशेष काहीच करावं लागलं नाही. नेहमी प्रमाणे ऊछलकुद आणि स्वत:च्याच मस्तीत रमणारा अज्जू साकारण्यासाठी विशेष मेहनितिची गरजच नव्हती. ‘राजबिंड रुपडं, कमावलेली बॉडी, नृत्यकौशल्य’ वरूण धवनची सेलेबिलीटी टिकवून आहेत. जान्हवी कपूरला घरूनच ‘आशीर्वाद, प्रोत्साहन आणि लीगसी’  लाभल्याने तिची बॉलीवूडमध्ये एन्ट्री सोपी झाली. अभिनयाच्या बाबतीत ही दोघंही ‘यथातथाच’ आहेत. मनोज पहावा आणि अंजुमन सक्सेना यांच्या भूमिका लहान असूनही त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे लक्षात रहातात. मनोज तिवारी हा चांगला अभिनेता असूनही त्याला ही भूमिका शोभलेली नाही कारण त्यामध्ये करण्यासारखं काहीही नाही. परदेशातील पात्रांचा अभिनय निश्चितपणे परिणामकारक झाला आहे. किंबहुना म्हणूनच ‘नायक नायिका आणि प्रेक्षक’ कथानकाकडे आकर्षित होतात आणि त्याचा परिणाम सर्वांवर झाल्याने चित्रपट यशस्वी ठरतो.

सारांश
इतिहासातील प्रसंग जरी परिणामकारक झाले असतील तरीही जे या चित्रपटात दाखवलं आहे त्यापेक्षा वास्तव कितीतरी ‘व्यापक, भयानक आणि चित्तथरारक’ होतं. सामान्य प्रेक्षकांना याच्याविषयी फारशी माहिती नसल्याचा फायदा घेत ‘लेखक आणि दिग्दर्शक’ यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘परदेशातील चित्रीकरण, प्रेक्षणीय स्थळे आणि हळहळू फुलत जाणारं नातं’ या प्रसंगांनी प्रेक्षकांना हा बादरायण संबंध पटवून दिला आहे. आजच्या चित्रपटात ‘परदेशीय प्रेक्षणीय स्थळे’ इज अ मस्ट! कदाचित लेखन कमजोर आणि दिग्दर्शन प्रभावी झाल्याने ‘अजय आणि निशा’ पेक्षाही त्यांच्या आईवडिलांच्या भूमिका जास्त कसदार आणि प्रभावी झाल्या आहेत. एक वेगळा विषय उत्तमपणे हाताळला आहे, जे कौतुकास्पद आहे.

एनसी देशपांडे
९४०३४ ९९ ६५४

N C Deshpande
एनसी देशपांडे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!